आपणा सर्वांचे समूहामध्ये हार्दिक स्वागत, भेट दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार

I Welcome you all.. Thanks for visiting blog, please leave your comments..which will give me idea to modify our blog.... Dinesh Suryawanshi

Monday, January 23, 2012

शिवराज्याभिषेक कारण, कार्य, भाव

नमस्कार मित्रहो,

शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल थोडीशी माहिती मिळाली आहे ती इथे देत आहे, प्रामुख्याने  शिवराज्याभिषेकाचे  कारण, कार्य, भाव....


कारण -

शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक नाटयमय प्रसंग आपल्यासमोर येतात. त्यापैकी महत्त्वाचा प्रसंग म्हणजे आग्राभेट प्रत्यक्ष कळीकाळाच्या कराल दाढेतून महाराज कसे बचावले ? हे त्या जगद्नियंत्या परमेश्वरालाच ठावूक शिवरायांचा धूर्तपणा, साहस, धाडस, संकटकाळी शांतपणे विचार करून मार्ग काढण्याची प्रवृत्ती या सर्वांचाच कस या प्रसंगाने लावला व महाराज आणि नंतर युवराज संभाजीराजे महाराष्ट्रात किल्ले राजगडी सुखरूप पावले. इथे पोहोचल्या नंतरच किल्ले राजगडावर घडलेली हि कथा जी आपल्याला राजाभिषेकाचे कारण सांगते.
शिवराय व संभाजी राजे यांना राजगडी सुखरूप पाहून जिजामातासाहेब धन्य जाहल्या. त्यांच्या उरावरचे मणामणाचे ओझे क्षणार्धात नाहिसे झाले. आपल्या पुत्र व नातवाचे मृत्यूला स्पर्शून आलेले जीवन पुढे कुठलेही संकट न येता व्यतित व्हावे अशी प्रार्थना त्या माऊलीने आपल्या कुलदेवतेला केली. व त्याच आनंदात एका मेजवानीचे किल्ले राजगडावर आयोजन केले. आसमंतातल्या मातब्बर वतनदारांना, राव मराठयांना त्या मेजवानीची आमंत्रणे, निमंत्रणे गेली. व मेजवानीच्या पूर्ततेची सिध्दता सुरू झाली. डिसेंबर १६६६ हा सुमार होता.
प्रत्यक्ष मेजवानीचा दिवस उजाडला. शिवाजी महाराजांचे खाजगी चिटणीस बाळाजी आवजी चित्रे व इतर प्रधान मंडळी किल्ले राजगड पद्मावती माचीवरील दिवाण-इ-आममध्ये मेजवानीच्या बैठकीची व्यवस्था पहात होते. मुदपाकखान्यात स्वतः जिजामाता जातीेने हजर राहून पदार्थांची सिध्दता करवून घेत होत्या.
या मेजवानीत ब्राम्हण, सर्व मानकरी, पदाधिकारी, अमीर-उमराव, सरदार यांना बोलावणे होते. त्याप्रमाणे एकेकाचे येणे सुरू झाले. यासमयी कारभारी यांनी पंगतीच्या मध्यभागी चौरंग ठेवून गादी घालून थोडे उच्चासन तयार केले. त्याच्या दुतर्फा इतर मंडळीना बसण्याची चोख व्यवस्था केली. याठिकाणी आलेल्या काही सरदारांना ते उच्चासन बघून ईर्षा वाटली की “आम्ही जुने तालेवार, राजे, अधिकारी असतां हे (शिवाजी राजे) अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्ही सेवकभावी दाखविणार. आम्हांस या कचेरीत बसावयाची गरज काय ?” असे बोलून उठून निघून गेले. या स्थळी महाराज पोहोचल्यावर त्यांनी इतरांसमवेत भोजन केले पण त्यांच्या कानी हि उपश्रूती गेली होती.
सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर महाराजांनी झाल्या प्रसंगाची चौकशी केली. पण त्यांना स्पष्टता कळेना. तेव्हा त्यांनी त्या प्रसंगी व्यवस्था पहाणाऱ्या आपल्या खासगी चिटणीसांना या गोष्टीबद्दल माहिती विचारली. तेव्हा बाळाजी म्हणाले, “महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहिजे. त्याशिवाय राजे म्हणविणे इष्ट नव्हे. स्वयंभू पदवी असावी. जो छत्रसिंहासनाधीस राजा असतो, त्यास लोक ईश्वरसदृश मानितात.”



कार्य -

परशूरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे सांगितले जाते. त्यामुळे जनमानसात काही गैरसमजही रूजले. काही पुराणांनी या गोष्टीला दुजराही दिला. त्याचबरोबर देवगिरीच्या पतनानंतर महाराष्ट्रात हिंदूचा राजा होणार नाही अशा विचारांचा लोकांवर पगडा होता. पण या सर्वांना शिवराजाभिषेकाने चोख उत्तर दिले.
महाराष्ट्रामध्ये क्षात्रतेजाची कमतरता नव्हती. बारा मावळात आणि सह्याद्रीच्या पश्चिम किनारपट्टीत धैर्यशील - शौर्यशील माणसे कमी नव्हती. त्यांचा वचकही कमी नव्हता. पण त्या सर्वांना एकत्र आणू शकणाऱ्यांचीच कमतरता होती. कारण मुख्य राव मराठा जातच संघटीत नव्हती. प्रत्येक राव मराठा बारा मावळांतील आपल्या कुंपणात व आपल्या अधिकारी मुलखातील मर्यादेंत राहून आपली सत्ता गाजवित होता.
शिवरायांनी राजाभिषेकाआधी अशा राव मराठा जाती साम-दाम-दंड-भेद नीतीने वठणीवर आणल्या आणि राजाभिषेकाच्या माध्यमातून त्यांच्यावर अंकुश ठेवला. ज्या प्रादेशिक सत्ता त्यांना आडव्या आल्या त्यांना त्यांनी वेळप्रसंगी कापून काढले. नामोहरम केले. परंतु त्यांचे बुध्दिनिष्ठ समाजांतील शासकीय अधिकारी पारखून आपल्या जवळ ठेवले. तसेच लष्करी अधिकारी व युध्दकुशल योद्ध्यांना कौल देऊन आपलेसे केले व या सर्व लोकांनी शिवरायांशी, स्वराज्याशी आपले इमान राखले. अशा आश्रित लोकांना राजाभिषेकामुळे चिरशास्वत स्वरूपाचा आत्मविश्वास मिळाला.
राजाभिषेकाच्या माध्यमातून शिवरायांनी अनेक गोष्टी साधलेल्या दिसून येतात. स्वराज्याशी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या गुणांची कदर राजदरबारात केली जाते. उच्च पद देताना आपली जात, धर्म या गोष्टी पाहिल्या जात नाहीत, तर आपले धाडस, शौर्य यांचा विचार केला जातो. आपल्या वीरमरणाऱ्या पश्चात आपल्या उर्वरीत कुटुंबाची जबाबदारी राजसत्ता स्विकारील. या सर्व गोष्टींची खात्री मागची-पुढची उदाहरणे पाहून पटू लागली. शिवराजाभिषेकाचा सूमुहूर्त मृगसालाशी संलग्न धरल्यामुळे शेतकरी पेशाच्या कुणबी मराठयात आणि दूतरेजनांत आत्मियता निर्माण झाली. प्रसंगी शेतीवाडीस लागणारे साहित्य, बैल, जमीन, बी-बियाणे यासाठी राजाकडून कर्जवाम मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी झाला. बागाईतदाराला त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळत गेला. काही वेळ बागाईतदाराचे त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळत गेला. काही वेळ बागाईतदाराचे उत्पन्न प्रस्थापित सरकारच योग्य भावांत खरेदी करू लागले. जे कारागिर होते. त्यांच्यावर बसवलेली पट्टी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या स्वरूपात सरकारी अधिकारी स्विकारू लागले. तसेच व्यापार उदीम करणारे लोक यांनाही संरक्षण मिळाले. सह्याद्रीलगतच्या घाटाघाटातून देश आणि कोकण यामध्ये चालत असलेल्या व्यापारी मालाची वाहतूक सुखरूपपणे होऊ लागली. सर्व व्यवहार राजधानीतूनच होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. बाजारपेठा सुरक्षित झाल्या याची साक्ष शिवराजाभिषेक समयी भर दरबारात सन्मानाने उभे असलेले नैगम आणि वाणी देतात. तशीच किल्ले रायगडावरील “न भूतो न भविष्यति” अशी हुजूर बाजारपेठ निर्माण झाली. बंदराबंदरातून व्यापार व वाहतूक संरक्षित व सुरक्षित होण्यासाठी राज्यसंस्थेचे आरमार गस्त घालू लागले. स्वराज्य हे प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले.

भाव -

आपला राजा झाला म्हणून लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला. आपणांस योग्य न्याय मिळेल याची खात्री वाटू लागली. आपल्यावर अन्याय, अत्याचार होणार नाही. याबद्दल विश्वास वाटू लागला. आपल्या धर्माप्रमाणे चालीरीतीप्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करू शकू. हे सत्य राज्य निर्माण झाल्यामुळे लोकांना पटू लागले. प्रसंगी स्थानिक सरकारी अधिकाऱ्याकडून आपणांस न्याय नाही मिळाला तर सरळ राजदरबारात आपली वर्णी लागेल व आपणांस न्याय मिळेल हे तळागाळातील लोकांनाही पटले. शिवराजाभिषेकानंतर आणि आधी जनसामान्यातील जे लोक पदाधिकारी झाले. त्यावरून हि राजसत्ता गुणांची कदर करणारी आहे. याबद्दल लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
भट, भिक्षू, बैरागी, गोसावी अशा कर्मकांड करणाऱ्या याचकाला झालेला राजा आपल्याच धर्माचा असल्याने त्यांच्या राज्यात आपल्या उपजीवीकेची ददात पडणार नाही असे वाटले. कवी, शाहीर आणि धार्मिक ग्रंथ निर्माण करणारे उच्चपदस्थ ब्राम्हण तसेच ज्योतिषी पूजापाठ, देवस्थळांची देखभाल करणारे अधिकारी ब्राम्हण यांना राजाश्रय मिळविण्याबद्दल आता भ्रांत राहिली नाही. असे लोक दरबारापर्यंत जाऊन आपल्या धार्मिक संस्थानातील सण-उत्सव साजरे करण्याकरिता जमिन बिदागी शिवरायांच्या हिंदूधर्माष्ठित दरबारातून सहजपणे मिळवू शकत होते. त्यामुळे राजांचे व राज्यांचे ते शुभ चिंतू लागले. दर्यावर्दी लोकांना आपल्याच धर्माची राजसत्ता असल्यामुळे स्वाभिमानाचे जिणे जगणे सहज शक्य झाले. शेतकरी वर्गाला राजांच्या कडक अनुशासनामुळे आपल्या भर पिकातून फौजफाटा जाणार नाही अगर उभे पिक कोणी कापून नेणार नाही. याबद्दल खात्री वाटू लागली. वाणी-उदीमी लोकांना आपला व्यापारी माल घाट मारून कुणी लुटणार नाही असा विश्वास शिवराजाभिषेकामुळे निर्माण झाला.

शिवरायांनी नेहमीचे हे राज्य ‘श्रीं’ चे व जनतेचे मानले. त्यात कुठेही ‘मी’ पणा आणला नाही आणि म्हणूनच प्रत्येकजण स्वराज्यात स्व-तंत्रता अनुभवू लागला. प्रत्येकाला हे राज्य आपले वाटू लागले. शिवरायांनी व्रतस्थपणे कल्याणकारी हुकूमशाही राज्यकारभारपध्दती अवलंबलेली होती.



.....सौ. शिल्पा परब - प्रधान

शिवरायांबद्दल गौरवोद्गार

नमस्कार मित्रहो,

शिवरायांच्या किर्तीबद्दल अनंत व्यक्तींनी स्तुती केलेली आपण ऐकलीच आहे, आपल्या शिवरायांना केवळ हिंदुस्थानातीलाच नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक महान व्यक्तींनी प्रेरणास्थान मानले आहे,

जगातील कानाकोपर्यातून शिवरायांबद्दल गौरवोद्गार ऐकायला मिळतात, त्यापैकी काही मी इथे सदर करत आहे:-



मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) -
"छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) -
"छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."

मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) -

"साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) -

"छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

ब्यारन कादा (जपान) -

"छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) -

"छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) -

"छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) -

"स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."


वरील काही उदाहरणे आणि इतरही अनेक अशी उदाहरणे तुम्हाला मिळतील , त्यामुळेच माझ्या या राजांचे गुणगान गाताना छाती गर्वाने फुलली नाही तर नवलच..


जय शिवराय..

शाहिरी

शाहिरी म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज.

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं.
नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो.
देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराक‘मांच्या वर्णनाने भारावून जाते.


शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भाषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे.
तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. वीरांच्या गाथा मांडताना शाहिरांचा डफ जसा कडाडून उठतो, तसाच तो पळपुट्यांवर तुच्छतेनं हसतो देखील. पण त्याचं हसण किंवा त्याचं कडाडणं हे सर्वस्वी अवलंबून आहे ते मराठी माणसाच्या भावनांवर. मराठी मन जसा विचार करत असेल, तसाच पोवाडा बोलत राहतो.
मनोरंजनाची माध्यमे बदलली, समाजप्रबोधनाची साधने बदलली आणि शाहिरी कालौघात नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इतिहासाचा मागोवा, पराक्रमाचा जयजयकार आणि प्रबोधनातून शूर जन्माला घालणारी ही कला येत्या पिढीला घडविण्याच्या कामी येऊ शकते व त्यासाठी तिचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

गोंधळी

महाराष्ट्रातील लोककला प्रकारात किर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे.
गोंधळ आणि गोंधळी प्राचिन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे.
विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे.
कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी.

अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला ‘संबळ गोंधळ’ म्हणतात.
तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला ‘काकडा गोंधळ’ असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी.
आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. लग्न, मुंज किंवा इतर शुभकार्यावेळी घरी 'गोंधळ' घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे.
शतकानुशतके भक्तिभावाने घातल्या जाणार्‍या या गोंधळाचे स्वरूप बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मकदृष्ट्याही बदलत आले आहे. भाविकाच्या घरी गोंधळ घालण्यासाठी येणार्‍या गोंधळ्यांच्या पिढ्या काळासोबत ज्ञानात वाढ व सादरीकरणात बदल करत राहिल्याने काही दशकांपूर्वीचा गोंधळ वेगळा होता असे वाटून जाते.
आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.

Sunday, January 22, 2012

शिवरायांचे मावळे- जीवा महाला

जिवबा महाला यांच्याबद्दल न जाणणारा असा कोण आहे ज्याला माहिती नाही,

श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी  एक असे हे जीवा महाला !!

या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय,

प्रतापगडावरील महाराजांचा पराक्रम तर सर्वश्रुतच आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या पराक्रमाचे विश्लेषण  सांगण्यापेक्षा इथे प्रेषित असलेल्या जिवबा महाला यांच्याबद्दल सभासद बखरीत असलेले प्रतापगडाच्या  लढाईचे वर्णन आणि जिवबा महाला यांचा पराक्रम सांगत अर्थात देत आहे :-



"छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व चौथरीयाखाले उडी घालोन निघोन गेले..
इतक्यात सैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजियावरी चालविले. तो राजियाने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.

पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला.

तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले."


आणि याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे "होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशी उक्ती प्रचलित झाली.

अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली....

अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा..


धन्य ते शिवराय आणि धन्य ते शिवरायांचे मावळे..

वेडात मराठे वीर दौडले सात


वेडात मराठे वीर दौडले सात.....

त्या सात योद्धांची नावे....

१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर


त्याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.

मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.

पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल.
शिवरायांनी म्हटल होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".

हे वाक्य वाचुन त्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.